पुस्तकाचे नाव - दास डोंगरी राहतो
लेखक - गोपाल नीलकंठ दांडेकर (गो . नी . दांडेकर )
प्रकाशक - मृण्मयी प्रकाशन
किंमत - रुपये- ३७५/-
पाने - २९७
"शुभमंगल सावधान " असं भटजी नी म्हणल्यावर ज्यांनी बोहल्यावरून धुम ठोकली होती ते रामदास स्वामी , ज्यांनी मनाचे श्लोक लिहले ते रामदास स्वामी असं लहानपणापासून ऐकलं होत पण रामदास स्वामी हे त्यापेक्षा मोठे आणि अनंतापर्यंत आहेत .
दास डोंगरी राहतो हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र सांगणारी ही कादंबरी गो.नि. दांडेकर यांनी लिहिलेली आहे. श्रीसमर्थ रामदासाचं चरित्र सांगणारी ही रसाळ कादंबरी आहे.
नारायण हे मूळ नाव आणि जांब (जिल्हा - जालना) हे मूळ गाव . रामरायाच्या ओढीसाठी लग्नाच्या मंडपातून धुम ठोकुन थेट नाशिक गाठलं आणि तिथेच काही काळ वास्तव्य केल. नारायणाचे रामदासस्वामी झाले.
धर्मशाळेत राहणं, माधुकरी मागणं, प्राचीन ग्रंथांचं वाचन असं वेगळं जीवन सुरु झालं. मुलांबरोबर हास्यविनोद, यतींसमवेत शास्त्रचर्चा, मुनींशी परमार्थचिंतन, एकांतात रघुवीरस्मरण असा दिनक्रम सुरु झाला. विरक्त आयुष्य जगणाऱ्या रामदासस्वामीनी देशाच्या संसाराची चिंता वाहिली. दासबोधसारख्या ग्रंथाची देणगी दिली.
स्वामींचे वाचन अफाट, अनेक स्मृती ग्रंथ , धर्म शास्त्र , ऐतरेयोपनिषद (उपनिषदे ), रामायणाचे बालकांड आणि बरेच साहित्य त्यांनी वाचले याची ओळख गो . नी . दांडेकर वाचकाला वेगवेगळ्या प्रसंगातून करून देतात.
रामदास स्वामींचा प्रवास नाशकातुन नंतर हिमालयात आणि परत सह्याद्री , सगळा देश पायी पालथा घातला . लोकांची सुख , दुःख अगदी जवळून पहिली .
वाई ला कृंष्णामाईच्या घाटावर तरुणांना एकत्र करून जी बलोपासना त्यांनी सुरु केली आणि सूर्यनमस्कारचे महत्व मुलांना पटवुन देण्यासाठी ते ११०० सूर्यनमस्कार घालत याच वर्णन वाचुन खुप प्रेरणा मिळते.
११ रुद्र मारुती, चाफळ चे श्रीरामांचे मंदिर यांची स्थापना रामदास स्वामींनी केली . या सर्व प्रसंगाचे वर्णन इतक्या सुंदर पद्धतीने केले आहे की वाचकाला आपल्याजवळ स्वामी असल्यासारखे वाटते . छत्रपती शिवाजी महाराज यांची आणि रामदास स्वामींची भेट वाचुन अंगावर शहरा उभारतो . अफजल खानाच्या भेटीवेळी रामदास स्वामींची अस्वस्थता अतिशय अचुक शब्दात मांडली गेली आहे.
या साऱ्याची कथा पुन्हा पुन्हा वाचावी अशी !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा