पुस्तक समीक्षा - ३/१७/२/२६
पुस्तकाचे नाव - लमाण
लेखक - डॉक्टर . श्रीराम लागू
प्रकाशक - @popularprakashan
गेल्या काही दिवसापूर्वी लमाण वाचुन पूर्ण झाले. हे केवळ एक पुस्तक नसुन डॉ.श्रीराम लागू यांनी आपल्या आयुष्याचा विस्तृत जीवनपट वाचकासमोर ठेवलेला आहे. पुस्तक वाचतांना तो डोळ्यासमोरून झरझर निघुन जातो. आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे' हे शिरवाडकरांचे वाक्य पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचायला मिळते. आपल्या एवढ्या दीर्घ आयुष्यात श्रीराम लागूंनी बरेच काही करुन ठेवले आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला, मराठी रंगमंचावरचा एक नट हा लागूंचा फक्त एक चेहरा झाला. यापलिकडे एक सशक्त निर्माता व दिग्दर्शक, एक चांगला वाचक व अभ्यासक, प्रायोगिक रंगभूमीवरचा एक प्रज्ञावंत कलाकार आणि सामाजिक तळमळ असलेला एक सच्चा माणूस असे लागूंचे अनेक चेहरे 'लमाण' वाचल्यानंतर ध्यानात येतात.
हे पुस्तक श्रीराम लागू यांनी दोन भागात मांडले आहे. १.त्यांचे वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, डॉक्टरकीचा व्यवसाय आणि नाटकप्रेम. २.व्यावसायिक रंगभूमीवरचे आयुष्य.
सुरुवातीच्या काळातला एक हौशी नट ते नाट्य - सृष्टीतला एक बुजुर्ग कलाकार, या प्रवासात त्यांना आलेले अनुभव, भेटलेली माणसे, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना एक वाचक आणि नाट्य प्रेमी म्हणून अगदी गुंतवुन ठेवतात. कलाकारांचे आयुष्य खुप खडतर असते. अगदी सुरुवातीच्या काळात अनेक गैरसोयीं, अडचणी,गैरव्यवस्था त्यांना सहन कराव्या लागल्या होत्या. कलाकाराला लाभलेल्या यशामागे त्याची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा किती प्रमाणात लागत असेल याचा पुरेपुर अंदाज वाचकाला येतो. १९६० साली लंडन मध्ये कायमचे वास्तव करणे शक्य असुन सुद्धा नाटकाच्या ओढीने ते भारतात परत आले आणि वयाच्या ४० व्या वर्षानंतर व्यावसायिक रंगभुमीवर आणि 'पिंजरा' चित्रपटाच्या माध्यमातुन पदार्पण केले. साडेतीनशेच्या वर पानांचे हे आत्मचरित्र श्रीराम लागूंनी अगदी मोकळेपणाने लिहिले आहे, त्यांचं मद्यपान, दोन लग्न, तरुण वयात आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याविषयी त्यांनी लिहलं आहे.
निळू फुले, भालबा केळकर, व्ही. शांताराम, सुहास जोशी, मोहन तोंडवळकर अशा लोकांबरोबरचे लागूंचे व्यावसायिक संबंध आणि त्यामधले ताणतणाव याविषयी मोकळेपणाने लिहलं आहे.
कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, गो.पु.देशपांडे, रत्नाकर मतकरी, चिंत्र्यं.खानोलकर,पु.ल. देशपांडे,सरीता पदकी या लागूंच्या समकालीन प्रसिद्ध नाटककारांबद्दल श्रीराम लागू यांची मते वाचण्यासारखी आहेत. तेंडुलकरांच्या नाटकांविषयी लिहिताना तर लागूंची भाषा अधिकच बहरते.
आपल्या या दीर्घ आणि संपन्न नाट्यप्रवासाविषयी लिहिताना लागूंनी आपल्या आसपास, आपल्या समाजात घडत असलेले चढ उतार डोळसपणे टिपले आहेत.
१९८७ साली सगळ्या महाराष्ट्रात फिरुन 'लग्नाची बेडी' या नाटकाचे प्रयोग करुन महाराष्ट्रात "सामाजिक कृतज्ञता निधी" जमा करण्याचा हा उपक्रम केला होता.
'लमाण' हा फक्त एका मराठी नटाचा प्रवास नाही, तर तो मराठी नाट्यविश्वाच्या पन्नासेक वर्षांचा एक तुकडा आहे. एकूण 'लमाण' फार आवडले.
Insta @readersbookcafe
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा